Thane jeevandeep 18/02/2026 sthanik-batmya Share

मुरबाड : महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग. या पांडुरंगाला भेटण्याची ईच्छा तर प्रत्येकाची असते. पंढरीला जाऊन प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडले तर आयुष्याचे सार्थक होते. महाराष्ट्रातील थोर संतांनीही या पांडुरंगाची भक्ती व पायी वारीचे महत्व सांगितले आहे. म्हणून महाराष्ट्रातील वारकरी या विठ्ठल भेटीसाठी आसुसलेला असतो. मनी जायची ईच्छा असते परंतू सर्वानाच इथपर्यंत जाणे शक्य होत नसते.
मात्र मुरबाड तालुक्यातील वडवली येथिल सामाजिक बांधिलकी ग्रुपने यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम सुरु केला असून गेले सहा वर्ष तब्बल तीनशे एक्कावन्न लोकांना फक्त नाममात्र १ रूपयात पंढरपूरची यात्रा घडवली जाते, व परत येत असताना जेजुरीचा खंडोबा व आळंदीला ज्ञानोबा माऊलींचे दर्शनही होत असते. सामाजिक बांधिलकी ग्रुपचे अध्यक्ष हभप गणपत (भाई )देऊ कराळे व सचिव तथा खरेदी विकी संघाचे संचालक अनंता (आण्णा ) शिंगोळे यांचा याकामी पुढाकार व आर्थिक नियोजन असते.
विशेष म्हणजे पंढरपूर मध्ये नेलेल्या वारकऱ्यांसाठी यावर्षी विशेष अशी लकी ड्रा सोडत काढली गेली असून बक्षिसांची खैरात केली आहे. यामध्ये महिलांसाठी ११ पेठण्या, १ सोन्याची नथ,१० बॅग, २ मोबाईल फोन, १ घड्याळ, मिक्सर, कुकर, स्वेटर अशा खास वस्तू लकी ड्रा जिंकलेल्या भक्तांना वाटप करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तर ही यात्रा सुरळीत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मंडळ वडवली यांचे मोलाचे सहकार्य लाभले.