Team jeevandeep 17/05/2025 sthanik-batmya Share
शहापूर ग्रामिण : वसई ग्रामीण भागातील घरांच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार स्नेहा दुबे (पंडित) यांनी पुढाकार घेतला असून यासंदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.
वसईच्या ग्रामीण भागातील घरांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत विविध योजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये अर्नाळा किल्ला आणि 7 गावे, अर्नाळा गाव व 16 गावे तसेच तिल्हेर गाव व 12 गावे अशा तीन योजनांचा समावेश आहे. या तीन योजनांना सन 2008 मध्ये शासनाने मंजूरी दिली होती. मात्र त्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही या योजना पूर्णत्वास गेल्या नाहीत. त्यानंतर शासनाने पुन्हा सन 2022 मध्ये या योजनांना नव्याने मंजूरी देऊन त्याप्रमाणे कार्यादेश देण्यात आले. मात्र निविदेनुसार विहीत कालावधी पूर्ण होऊनही या योजनांची कामे पूर्ण झालेली नाहीत.
सदर, याबाबत स्थानिक आमदार स्नेहा दुबे (पंडित) यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पालघर तसेच वसई-विरार शहर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत यापूर्वी तीन बैठका घेऊन या बैठकांदरम्यान निदर्शनास आलेल्या बाबी शासनाच्या निदर्शनास आणून त्यावर तातडीने कार्यवाही करावी व या वर्ष अखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सर्व गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू व्हावा यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मागील कित्येक वर्षापासून रखडलेल्या या योजनांची तपशीलवार आकडेवारीसह माहिती सादर करून या प्रकरणी शासनाने लक्ष घालून योग्य ते आदेश देण्याची विनंती केली तर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे तसेच एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीवर टॅपिंग करण्याची कार्यवाही त्वरेने पूर्ण करण्याच्या सूचना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना देऊन या योजनांची कामे गुणवत्तापूर्ण असतील यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत त्याची तपासणी करून घेण्याचेही आदेशित केले असल्याचे आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या वसई पश्चिम जनसंपर्क कार्यालयीन दिलेल्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे म्हटले आहे.