team jeevandeep 27/12/2024 sthanik-batmya Share
कल्याण : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या छत्रछायेमध्ये दिनांक 24, 25 व 26 जानेवारी, रोजी मिलीटरी डेअरी फार्म ग्राउंड, पिंपरी पुणे येथील विशाल मैदानांवर आयोजित केला जात आहे. परमात्म्याची ओळख करुन मानवी जीवन दिव्य गुणांनी युक्त करत अनंताकडे विस्तारित करुन विश्वामध्ये सौहार्द व शांतीसुखाचे वातावरण निर्माण करणे हा या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे.
या भव्यदिव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी स्वेच्छा सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मंडळाच्या प्रचार-प्रसार विभागाचे मेंबर इंचार्ज मोहन छाब्रा यांच्याहस्ते बुधवारी करण्यात आला. या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इंचार्ज जोगिंदर मनचंदा, प्रचार प्रसार कॉर्डिनेटर (महाराष्ट्र) डॉ.दर्शन सिंह, समागम समितीचे चेअरमन शम्भुनाथ तिवारी, समन्वयक ताराचंद करमचंदानी आणि समागम समितिच्या अन्य सदस्यांसहित समस्त महाराष्ट्रातील सेवादल क्षेत्रीय संचालक उपस्थित होते. हजारो सेवादल स्वयंसेवकांसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविक भक्तगणांनी या समारोहामध्ये भाग घेतला. मुंबई महानगर प्रदेशातून शेकडोंच्या संख्येने निरंकारी सेवादल स्वयंसेवक आणि भक्तगणांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतला.
महाराष्ट्रात वार्षिक निरंकारी संत समागमांची परंपरा फार जुनी आहे. 1968 मध्ये महाराष्ट्राचा पहिला संत समागम मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला व त्यानंतर सतत 52 संत समागम मुंबई महानगरातच होत आले. सन 2020 मध्ये 53वा संत समागम नाशिक मध्ये झाला, 56वा संत समागम छत्रपती संभाजी नगर येथे तर 57वा संत समागम नागपुर नगरी येथे आयोजित करण्यात आला. यावर्षी हा 58वा संत समागम आयोजित करण्याचे सौभाग्य वि़द्येचे माहेरघर पुणे नगरीला प्राप्त झाले आहे, ज्याचे साक्षी अवघे विश्व होईल.
समालखा येथे आयोजित 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमानंतर प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक भक्त महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या तन्मयतेने समागम स्थळावर पूर्वतयारीसाठी आपल्या निष्काम सेवा अर्पण करत आहेत.