team jeevandeep 18/03/2025 sthanik-batmya Share
डहाणू प्रतिनिधी :
पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रशासन आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीतील सुकड आंबा शिरसून पाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत टाकी बांधकाम सुरु आहे. या बांधण्यात येणाऱ्या अपूर्ण पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना 17 मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये हर्षला रशू बागी आणि संजना प्रकाश राव या सातवीत शिकणाऱ्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली आणखी एक विद्यार्थिनी थोडक्यात बचावली. अपूर्ण असलेल्या या टाकीच्या स्लॅबवर मुली खेळत असताना स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. यामध्ये साधारण 30 फूट उंचीवरून खाली पडल्याने हर्षला आणि संजना यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली एक विद्यार्थिनी स्लॅबला अडकल्याने तिचा जीव वाचला.