team jeevandeep 20/12/2024 sthanik-batmya Share
कल्याण : महाराष्ट्रात नुकतेच युती सरकार स्थापन झाले. या सरकारला ओबीसी समाजाने अभूतपूर्व असे मतदान केल्यामुळेच इतके प्रचंड बहुमत मिळवता आले. परंतू ज्यांच्या आदेशानुसार सर्व ओबीसी समाजाने महायुतीला मतदान केले ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, छगन भुजबळ. परंतु निवडून आल्यानंतर या सरकारला ओबीसींचा जणू विसर पडला आहे आणि त्यांनी भुजबळ यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान दिले नाही.
एक प्रकारे “सामाजिक न्यायाचा जो चेहरा” आहे तोच या सरकारने नाकारला आणि याला सर्वस्वी जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार हेच आहेत. असा समस्त ओबीसी समाजाचा समज झाला आहे. त्यामुळेच कल्याण मधील ओबीसी समाजाच्या व भुजबळ समर्थकांनी आज निषेध आंदोलन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये आयोजक ओबीसी संघर्ष समिती समन्वयक प्रशांत माळी, कल्याण पूर्वप्रमुख दुर्गेश बागुल, प्रमुख पदाधिकारी हिरामण बच्छाव, अशोक माळी, विक्रम बटवाल, युवराज लोंढे, आप्पा शेळके, वाल्मीक, वर्पे, विनोद झोपे, विलास उत्तेकर, आकाश नाथ व तर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जर लवकरात लवकर भुजबळ यांना न्याय नाहीं दिला, तर ओबीसी समाज येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला योग्य ती जागा दाखवून देईल असा इशारा देखील यातून देण्यात आला.