team jeevandeep 01/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : नविन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी म्हणजेच 2 जानेवारी 2025 रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. विद्युत आणि यांत्रिक उपकरणांच्या दुरूस्तीसह वितरण वाहिनीवरील पाणी गळती थांबवण्याच्या कामासाठी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा 2 जानेवारी रोजी तब्बल 18 तास बंद राहणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रात विद्युत तसेच यांत्रिकी उपकरणांची दुरूस्ती करणे आणि प्रभाग क्षेत्रातील वितरण वाहिनीवरची पाणी गळती थांबण्याचे काम यावेळी केले जाणार असल्याने गुरुवार 2 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत (१८ तास) पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
महापालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली आणि टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रामधून महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि डोंबिवली पूर्व तसेच पश्चिमेमध्ये यादिवशी पाणी नसणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरीकांनी पाण्याचा साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसी पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.