team jeevandeep 20/02/2025 sthanik-batmya Share
शहापूर ग्रामिण :- शहापूर पोलीस ठाणे आवारात असलेल्या गुन्ह्यातील जप्त व अपघातातील बेवारस असलेल्या चारचाकी व दुचाकी या वाहनांच्या मुळ मालकांचा गंगा माता या वाहन संस्थेने शोध लावला आहे. त्यामुळे मालकांना समजपत्र पाठवून सदर वाहनांची कागदपत्रे दाखवून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन शहापूर पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
शहापूर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गुन्ह्यातील व अपघातातील बेवारस असलेल्या चारचाकी व दुचाकी अशी एकूण 122 वाहने हे बऱ्याच काळावधी पासून पडून आहेत. सदरची वाहने नादुरुस्त व जुनाट तुटफूट झालेल्या अवस्थेत असल्याने मालकांनी कागदपत्रे दाखवून सात दिवसांच्या आत घेऊन जावीत अन्यथा त्या वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहनांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी जाहीर पत्राद्वारे दिले होते.
परंतु न्यायालयीन प्रक्रिया व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने हि वाहने मुळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकारी यांना दिले असता, पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार सहा.पो.नि. शिवकुमार जाधव, पो.ह. बी.जे. शेलार, भाऊसाहेब मुंढे, जितेंद्र गिरासे यांचे पथक नेमून आदेश दिले.
सदर, यासाठी गंगा माता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांची मदत घेऊन त्यांनी यासंदर्भात सर्व पत्रव्यवहार व बाबी पूर्ण करून वाहनांच्या मुळ मालकांचा शोध लावला आहे. त्यामुळे मालकांना समजपत्र पाठवून सदर पत्र मिळताच वाहनांची कागदपत्रे दाखवून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आठ दिवसांत वाहन घेऊन जावे अन्यथा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.