team jeevandeep 07/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरातील राजाराम पाटील नगर, काका ढाबा येथील दुकानांच्या अनाधिकृत पत्राशेडवर कारवाई करा आणि आडीवली येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी आई एकविरा महिला मंडळाच्या वतीने करण्यात आली असून याबाबत संस्थापक अध्यक्ष सोनी क्षीरसागर आणि समाजसेवक संदीप क्षीरसागर यांनी शहर अभियंता आणि उपायुक्तांना निवेदन दिले आहे.
राजाराम पाटील नगर, काका ढाबा येथील दुकानाचे अनाधिकृत पत्राशेड १० ते १५ फुट बाहेर काढले असुन यामुळे दुपारी शाळेच्या वेळी तसेच सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. त्या संदर्भात गेल्या एक महिन्यापासून सहाय्यक आयुक्त भारत पवार यांना प्रत्यक्षात भेट घेऊन या संपूर्ण विषयाची माहिती देण्यात आली असून सुद्धा ते देखील दुर्लक्ष करीत आहेत. तसेच श्री मलंग गड रोड हा एका साईडचा रोड ४० फुट असुन तेथे देखील हातगाडीवाले २५ फुटापर्यंत रस्त्यावर धंदा लावून वाहतुक कोंडी करत आहे. यापुर्वी देखील कित्येक वेळा तेथे अपघात झाले आहे. याची पुर्ण कल्पना देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही.
येत्या १० दिवसात या संपूर्ण गोष्टीचा तपशील करून कारवाई करण्यात आली नाहीतर जनता दरबार दिवशी १४ जानेवारी रोजी निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपायुक्त अवधूत तावडे यांना देण्यात आलं आहे.
तर आडीवली येथील अंतर्गत रस्त्यांची परिस्थिती खुप गंभीर असून तेथे तातपुरत्या स्वरूपात तातडीने रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी आई एकविरा महिला मंडळाच्या वतीने केडीएमसीच्या शहर अभियंता अनीता परदेशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची देखील अवस्था बिकट असून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे येथून ये जा करतांना नागरिकांना विशेषता महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करणे आवश्यक आहे.
त्यामुळे आडीवली परिसरातील गणेश चौक ते ३ बंगला मार्ग संत गजानन अपार्टमेंट पर्यंत, ३ बंगला ते हेरा अपार्टमेंट पर्यंत, निलम शाळा ते शनिवारपार्क मार्ग दुर्गा देवी माता मंदिर पर्यंत, सद्गुरू अपार्टमेंट ते अनंता भोईर चौक पर्यंत, साई आश्रय अपार्टमेंट ते अंजनाबाई गार्डन पर्यंत, अंजनाबाई गार्डन ते जानू सदन अपार्टमेंट पर्यंत, आस्था पाल अपार्टमेंट रोड या ७ रस्त्याचे डांबरीकरण करून तातपुरत्या स्वरूपात खंडडेमय तसेच घाणीतुन नागरिकांची सुटका करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.