team jeevandeep 24/01/2025 sthanik-batmya Share
कल्याण : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका व कडोंमपा बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था (रजि), कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान साहित्य संमेलन २०२५ चे आयोजन रविवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते रात्री १० वा. पर्यंत कल्याण (प.) येथील आचार्य प्र.के.अत्रे रंगमंदिर येथे करण्यात आले आहे.
या संविधान साहित्य संमेलन २०२५ मध्ये अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, याचा शुभारंभ दि. २६जानेवारी रोजी सकाळी ९.३०वा. उप आयुक्त रमेश मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून संविधान रॅलीने होणार आहे. या रॅलीचे उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याहस्ते करण्यात येईल.
तद्नंतर सकाळी ११ वा. महापालिकेच्या आचार्य प्र.के.अत्रे रंगमंदिरात संमेलनाचे अध्यक्ष-जेष्ठ संविधान तज्ञ ॲड.डॉ.सुरेश माने व महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार आहे. अमृत महोत्सवी संविधान साहित्य संमेलनात दुपारी १वा. जेष्ठ साहित्यिका डॉ.प्रज्ञा दया पवार व महापालिका उपायुक्त वंदना गुळवे यांची प्रकट मुलाखत जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांचेमार्फत घेतली जाणार आहे.
दुपारी २.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात करण्यात आले असून, त्याचे अध्यक्ष स्थान जेष्ठ लेखक व कवी प्रा.शुक्राचार्य गायकवाड भूषविणार आहेत. दुपारी ४ वा. "संविधान स्तंभाच्या जबाबदा-या आणि वास्तव" या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, जेष्ठ पत्रकार मधु कांबळे, मा.आमदार लहु कानडे, न्यायाधीश डॉ.डी.के.सोनावणे, माजी पोलीस आयुक्त डॉ.संजय अपरांती यांचा सहभाग राहणार आहे.
सायं. ६. वा. "मानवाच्या कल्याणाचा जाहिरनामा संविधान"* या विषयावर प्रा.डॉ.विष्णु मगरे यांचे अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, यात साहित्यिक डॉ.मिलींद कसबे सहभागी होणार आहेत. तद्नंतर सायं. ७.३०वा. सम्मेलनाध्यक्ष डॉ.ॲड.सुरेश माने, महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ आणि महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने संविधानावर विस्तृत चर्चा व विचार मंथन होणे अपेक्षित आहे त्यासाठी संविधान साहित्य सम्मेलन आयोजित केले आहे त्यामधील सर्व सत्रातील कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन या संमेलनाचे संयोजक चंद्रकांत पोळ यांचेमार्फत करण्यात आले आहे.