team jeevandeep 21/04/2025 mahila vishesh Share
प्रत्येक ऋतुत आपली दिनचर्या, आहारविहार इ. गोष्टी बदलत असतात, ही गोष्ट तर सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे बदलत्या ऋतूनसार आपण आपला पेहराव, खाणं-पिणं अशा दैनंदिन गोष्टींत ऋतुला अनुकूल असे बदल करत असतो. त्याचप्रमाणे ही गोष्ट गर्भवती स्त्रियांनाही लागू होते.
चेन्नई येथील श्री रामचंद्र वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या या विशेष अभ्यासांती लक्षात आलं की या गर्भवती स्त्रिया कडक उन्हात शेतकाम, वीटभट्टीवर मजूरी, स्थानिक शाळा तसंच रुग्णालयात मदतनीस म्हणून काम करत होत्या, अशा स्त्रियांना बाळाचं वजन कमी असणं, अकाली प्रसूती आणि गर्भपात होण्याचा दुप्पट धोका होता. त्यामुळे उन्हाळ्यातल्या गर्भावस्थेबद्दल बोलायचं झाले तर, तज्ज्ञ प्रखर उन्हाचा सामना करण्यासाठी हायड्रेशन हा एक महत्त्वाचा उपाय म्हणून शिफारस करतात.
सध्या प्रखर उन्हाळ्याचे दिवस आहेत. तुमच्या घरातही कोणी गर्भवती स्त्री असेल तर तिची आणि पर्यायाने येणाऱ्या बाळाची व्यवस्थित काळजी कशी घ्यावी, हे ठाऊक असणं फार महत्त्वाचं आहे. त्यातही गर्भवती जर पहिलटकरीण असेल तर ह्या माहितीचा उपयोग नक्की होऊ शकेल. काही वर्षांपूर्वी चेन्नई येथील श्री रामचंद्र वैद्यकीय महाविद्यालयात 'उष्णतेचा त्रास आणि प्रतिकूल गर्भधारणा' या विषयाचा अभ्यास करण्यात आला होता. यामध्ये जवळपास 800 गर्भवती स्त्रियांच्या दैनंदिन आहार-विहाराचा अभ्यास केला गेला होता. या अभ्यासातून मिळालेले निष्कर्ष विचार करायला भाग पाडणारे होते.
प्रखर उन्हात दीर्घकाळ काम केल्यामुळे शरीराला जास्त घाम येणं आपोआपच होतं. वेळोवेळी पाणी प्यायलं नाही तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्वचा कोरडी पडणे, तोंड कोरडे पडणे, डोळे कोरडे पडणे, जास्त तहान लागणे, हृदयाचे ठोके वाढणे, गर्भाच्या हृदयाच्या गतीची पद्धत बदलणे, इलेक्ट्रोलाइट असंतुलन इत्यादी समस्यांचा समावेश होतो.म्हणून आठवणीने पुरेसं पाणी, शहाळं, फळांचे रस पीत राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे नाडीची गती वाढते. आणि याचाच परिणाम म्हणून हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. पाण्याच्या कमतरतेमुळे पेशी कमी होऊ लागतात आणि त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. हे होऊ नये म्हणून गरोदर स्त्रियांनी नेहमीपेक्षा जास्त पाणी प्यावं. कारण उष्णतेव्यतिरिक्त, गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत उलट्यांमुळे पाण्याचे संतुलन देखील बिघडू शकतं.
उष्माघातामुळे शरीराचे तापमान 104 F पर्यंत वाढलं तर ही आपत्कालीन परिस्थिती आहे. उष्माघातामुळे मेंदू, हृदय आणि मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकतं. त्याची लक्षणं अशी आहेत. मळमळ, उलट्या, हृदय गती वाढणं, डोकेदुखी आणि बोलण्यात अडचण इ. हे टाळण्यासाठी प्रखर उन्हात बाहेर जाणं टाळा, शक्य असल्यास सकाळी लवकर किंवा संध्याकाळी बाहेर जा. परंतु आपले डोकं टोपी किंवा स्कार्फने झाकून ठेवा. दिवसातून किमान 2-2.5 लिटर पाणी प्या. यामध्ये साध्या पाण्याशिवाय नारळपाणी, ओआरएस, ताज्या फळांच्या रसांचा समावेश करता येईल.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात होत असलेलं रक्ताभिसरण मेंदूसाठी अपुरं पडतं. यामुळे रक्तदाब कमी होतो आणि मेंदूमध्ये ऑक्सिजनची उणीव भासते. परिणामी चक्कर येणे, स्नायू पेटके, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोराईड यांसारख्या इलेक्ट्रोलाइट्सचं असंतुलन होतं. हे टाळायचं असेल तर जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणी जाणे टाळावं आणि जावं लागलं तरी सैल सुती कपडे घालावेत.
गरोदर महिलांनी सैल सुती आणि तागाचे कपडे घालावेत. आणि असे कपडे शक्यतो सौम्य आणि फिकट छटेचे असावेत. असे रंग उष्णता शोषून घेत नाहीत आणि शरीराचं तापमान थंड राहण्यास मदत होते. उन्हाच्या वेळात कमीत कमी वेळ बाहेर जावं आणि बाहेर फिरायला जाण्यासाठी किंवा इतर कुठेतरी जाण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे पहाट किंवा संध्याकाळ. काही कारणास्तव बाहेर जावं लागलं तरी पाण्याची बाटली आणि छत्री सोबत ठेवा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.