team jeevandeep 05/05/2025 mahatvachya-batmya Share
दि. ०५ (जिल्हा परिषद, ठाणे) –
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, ठाणे जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन करत कोकण विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.७४% इतका लागला असून, एकूण ९६,०८९ विद्यार्थ्यांपैकी ८९,८२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यात मुलींचा निकाल ९२.९१% तर मुले ८९.५५% उत्तीर्ण झाले असून, मुलींची सरासरी कामगिरी मुलांपेक्षा जास्त आहे. तसेच जिल्ह्यात ८७५० विदयार्थी यांनी फेरपरीक्षा दिली असून त्या पैकी ५४२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले, “हा निकाल विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य यांचा संगम आहे. परीक्षेत पारदर्शकता राखण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांचे हे यश आहे.”
कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षा – ठाणे जिल्ह्याची यशोगाथा
शिक्षण विभागाने यंदा परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रांवर शिस्त व पारदर्शकता राखण्यासाठी खालील उपाययोजना केल्या होत्या:
१. ड्रोन कॅमेराद्वारे संवेदनशील परीक्षा केंद्रांवर देखरेख.
२. परीक्षा केंद्रांवर सर्व भौतिक सुविधा पूर्वतयारीतच उपलब्ध.
३. परीक्षा केंद्रांच्या बाहेरील परिसरात व्हिडीओ चित्रीकरण.
४. भरारी पथके व बैठी पथकांची नियुक्ती – ३२ केंद्रांवर भरारी पथके कार्यरत.
५. Maharashtra Prevention of Malpractices Act 1982 अंतर्गत नियमावलीची कडक अंमलबजावणी.
६. परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवणे व कलम १४४ लागू करणे.
या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी सांगितले, “या वर्षीच्या परीक्षेमध्ये शिस्त, पारदर्शकता आणि गुणवत्ता यांचा आदर्श ठाणे जिल्ह्याने घालून दिला आहे. कोणतीही अप्रिय घटना न घडता परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली, हे सर्व टीमवर्कचे फलित आहे.”
निकालाचे ठळक मुद्दे:
• एकूण विद्यार्थी:९६०८९
• उत्तीर्ण विद्यार्थी: ८९८२७
• एकूण निकाल: ९३.७४%
• मुली: ४६,९६५ उत्तीर्ण / ५०,७१५ एकूण विद्यार्थी → ९२.९१%
• मुले: ४८,२८३ उत्तीर्ण / ५४,१२४ एकूण विद्यार्थी → ८९.५५%