team jeevandeep 22/03/2025 mahatvachya-batmya Share
मुंबई :
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने डॉ. दीपक सावंत यांना कोविड-१९ महामारीच्या सामाजिक आणि राजकीय परिणामांवरील संशोधनासाठी पीएचडी प्रदान केली आहे. त्यांच्या प्रबंधामध्ये आरोग्य व्यवस्थेवरचा परिणाम, ऑनलाईन शिक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार आणि निवडणूक प्रक्रियेवरील प्रभाव यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.
डॉ. सावंत यांच्या संशोधनात महामारीदरम्यान आरोग्य यंत्रणेने घेतलेली आव्हाने, निवडणूक आयोगाची भूमिका आणि निवडणूक प्रचारामुळे संसर्ग कसा वाढला यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेची तुलना अमेरिकेशी करताना नमूद केले की, ट्रम्प प्रशासनाने मतदान केंद्रांवर कठोर सुरक्षाविषयक उपाययोजना राबवून संसर्गमुक्त मतदान सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या अभ्यासात लसीकरण प्रक्रिया, जागतिक लस स्पर्धा आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वारंवार बदलणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांवरील गोंधळ यांचाही समावेश आहे. तसेच, राजकीय नेत्यांची भूमिका, जनतेच्या समस्यांचे निवारण, ऑक्सिजन आणि लस पुरवठा, तसेच मास्क बंधनकारक करण्याच्या निर्णयांवरही त्यांनी भाष्य केले आहे.
डॉ. सावंत यांच्या संशोधनाचा मुख्य भर आरोग्य व्यवस्थापन, औषध पुरवठा, क्वारंटाईन आणि विलगीकरण धोरणे, लॉकडाऊन, जनता कर्फ्यू आणि स्थलांतरित कामगारांचे प्रश्न यावर आहे.
डॉ. **प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेल्या या संशोधन कार्यासाठी मिळालेली पीएचडी ही डॉ. दीपक सावंत यांची दुसरी पीएचडी असून, त्यांचा पहिला प्रबंध मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाच्या रुग्णालय व्यवस्थापनावर आधारित होता.