team jeevandeep 03/01/2025 mahatvachya-batmya Share
![]()
पुण्यात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेदेखील महानगरपालिकेत एकटे लढणार असल्याचं सांगितलं आहे.
अभिजित दराडे, पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री अर्थात अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तिघांच्या एकत्रित ताकतीमुळे महायुतीने २०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला. मात्र आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत महायुतीत मोठी फूट पडणार असल्याचे चिन्ह निर्माण झाल आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने महानगरपालिकेत एकटे लढणार असल्याचा निर्धार केल्यानंतर आता पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महायुती आता शहर पातळीवर फुटीच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे चित्र आहे.
जो अजित पवारांचा निर्णय तोच आमचा निर्णय
नुकतीच पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाने येणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपण स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पुण्यात महायुतीचे स्थानिक नेते काय निर्णय घेणार याकडे शहराचे लक्ष लागले होते. कालच शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी महायुतीत आपण ५५ ते ६० जागा लढवणार असल्याचा जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे घोषित केले आहे.
दोन महिन्यापूर्वीच अजित पवार यांनी पुणे महापालिका आपण स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले होते. जो अजित पवारांचा निर्णय तोच आमचा निर्णय असल्याने आम्ही आजही स्वबळावर महापालिकेची निवडणूक लढवण्यावरच ठाम असल्याचं दीपक मानकर म्हणाले आहेत.
पुण्यात राष्ट्रवादीचा 'एकला चलो रे'चा नारा
राज्यात महायुतीचं वातावरण असलं तरी या शहरामध्ये प्रत्येक पक्षाच एक वेगळं अस्तित्व आहे. महायुतीत आम्ही वेगळे लढलो तरी मैत्रीपूर्ण लढती होतील. नाना भानगिरे म्हणतात आम्ही ६० सीट लढवणार पण प्रत्यक्षात शिवसेनेच्या जागा किती हे त्यांनी पाहिलं पाहिजे. पुणे शहरात राष्ट्रवादीसाठी चांगलं वातावरण आहे. कार्यकर्त्यांना पुणे शहरात नगरसेवक पदाची संधी मिळाली, तर आम्ही चांगला रिझल्ट देऊ शकतो. त्यामुळे उद्या जरी म्हटलं तरी स्वबळावर आमची लढण्याची तयारी आहे, आजपर्यंत आम्ही लढायला घाबरलो नाही, असं म्हणत दिपक मानकर यांनी महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे.
महायुतीतील धुसफूस समोर
आधी शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी ५५ ते ६० जागांवर दावा केला आणि आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी तर थेट निवडणुकाच स्वतंत्र लढवणार असल्याचं घोषित करून टाकल्याने महायुतीतील धुसफूस आता समोर आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागलेली महायुती एकसंध राहणार का? हा खरा प्रश्न आहे. मुळात याचा निर्णय वरिष्ठ नेते घेणार असले तरी स्थानिक नेत्यांनी मात्र स्वबळाची तयारी सुरु केल्याने महायुती शहर पातळीवर तरी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.