team jeevandeep 28/04/2025 mahatvachya-batmya Share
मुंबई :
ठाणे व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निसर्गरम्य माळशेज घाटात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाजवळील टेकडीवर काचेचा स्कायवॉक उभारण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या प्रकल्पासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एक महिन्याभरात एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश त्यांनी दिले.
या संदर्भात मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी त्यांनी सांगितले की, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि अहमदनगरसारख्या प्रमुख शहरांजवळ असल्याने माळशेज घाटात स्कायवॉक उभारल्यास पर्यटनाला मोठी चालना मिळेल. जवळच शिवनेरी किल्ला, हरिश्चंद्रगड, धबधबे व पिंपळगाव जोगा धरण यांसारखी पर्यटनस्थळे असल्याने पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर ओघ वाढेल.
उपमुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभागाला प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, स्कायवॉक प्रकल्प उभारताना इको सेन्सिटिव्ह भाग वगळण्याचे आणि वनविभागाचा अभिप्राय विचारात घेऊन पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस आमदार किसन कथोरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.