team jeevandeep 28/04/2025 mahatvachya-batmya Share
मुंबई :
मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बस सेवेच्या दुप्पट दरवाढीच्या प्रस्तावाला आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र विरोध केला आहे. गेल्या २-३ वर्षांत सत्ताधाऱ्यांकडून बेस्टकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी बेस्ट वाचवण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे.
“सामान्य मुंबईकरांचं रोजचं जगणं कठीण व्हावं, असा सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय. जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा म्हणून ओळख असलेल्या बेस्टचं अधःपतन आम्ही सहन करणार नाही,” असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, “बसेसची संख्या आधीच रोडावली आहे, अनेक महत्वाचे मार्ग बंद केले आहेत आणि आता जर दरवाढ केली, तर त्याचा बेस्ट सेवेवर गंभीर परिणाम होईल.” त्यामुळे त्यांनी बेस्टची दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
यासोबतच त्यांनी, इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवावी, बेस्टचा दर्जा सुधारावा आणि मुंबईकरांना चांगली व सुरक्षित सेवा द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे.