team jeevandeep 13/03/2025 mahatvachya-batmya Share
ठाणे :
ठाणे जिल्ह्यातील शहरे एकमेकांना जोडण्यासाठी गेल्या सहा ते सात वर्षांपासून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. कल्याण-तळोजा मेट्रो प्रकल्पाची स्थापत्य कामे जेमतेम ३ टक्के इतकीच झाले असून वडाळा ते कासारवडवली मेट्रोसाठी दोन वर्ष तर, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसाठी चार वर्षे नागरिकांना वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
ठाणे जिल्ह्यातील रस्ते तसेच रेल्वे वाहतूकीवरील प्रवाशांचा भार कमी व्हावा तसेच नागरिकांना सार्वजनिक वाहतूकीसाठी नवा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशातून राज्य सरकारने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मेट्रो प्रकल्पाचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला. या नुसार, ठाणे जिल्ह्यात वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची घोषणा करण्यात आली असून या सर्व प्रकल्पांची कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहेत. मेट्रोच्या माध्यमातून जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण, मिरारोड यासह तळोजा परिसर एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. परंतु या सर्व प्रकल्पाची कामे संथगतीने सुरू असल्याची बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली असून यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आणखी काही वर्षे मेट्रोची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.