team jeevandeep 21/04/2025 adhyatma Share
बजरंगबाण हा पाठ बजरंगबली म्हणजे साक्षात हनुमानजी यांना समर्पित करण्यात आलेला आहे. बजरंगबाण या पाठमध्ये संकट हरण्यासाठी हनुमानजींना बोलावण्यात येते. आम्ही संकटात आहोत तुम्ही आमची मदत करायला या अशी विनंती प्रभू हनुमानजींना करण्यात येते. हा पाठ अतिशय शक्तिशाली असून याच्या पठणाने हनुमानजी भक्तांच्या हाकेला धावून येतात असे म्हणतात. इतकेच नाही तर या पाठमुळे मारुतीची निश्चित कृपा मिळते. हा पाठ कधी आणि कसा करायचा, हा पाठ करण्याचे महत्व आणि फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात.
बजरंगबाण पाठची कथा
संत तुलसीदास यांनी सोळाव्या शतकात बजरंगबाण पाठ लिहिल्याचे समजते. पौराणिक आख्यायिकेनुसार संत तुलसीदास यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन हनुमानजी त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि बजरंगबाण हे त्यावेळी हनुमानजींकडून तुलसीदास यांना मिळालेला आर्शीवाद आहे असे म्हणतात. त्यामुळे भक्त अडचणीत असताना बजरंगबाणचा पाठ करावा याने हनुमानजी धावून येतात असे मानले जाते.
बजरंगबाण पाठ करण्याची विधी
बजरंगबाणचा पाठ सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही केव्हाही करू शकता. हनुमानजींची भक्ती करण्यासाठी वेळेचे बंधन नसते. सकाळी उठून स्नान झाल्यानंतर हनुमानजींची पूजा करून बजरंगबाण वाचू शकता. तसेच काहीजण विशिष्ट इच्छा पूर्ण करण्यासाठी बजरंगबाणाचे पठण ४१ दिवस करतात. संकल्प घेऊन देखील १,११,१०८ अशा स्वरूपाचे बजरंगबाण पठण केल्याने हनुमानजी प्रसन्न होऊन कृपा करतात. बजरंग बाण पठण करताना भाविकांनी लाल कपडे घालावेत अशी मान्यता आहे.
बजरंगबाण पाठ केव्हा करावा
बजरंगबाण हा अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली पाठ असून संकट हरण्यासाठी हा पाठ केला जातो. भक्त जेव्हा जीवनमरणाच्या वाटेवर असेल किंवा खूप तीव्र इच्छा पूर्ण करायची असेल तरच हा पाठ करण्याचे सुचवले जाते. कारण असे म्हणतात या पाठमध्ये हनुमानजींना प्रभू श्रीराम यांची शपथ घातल्याने ते तुमचे काम पूर्ण करण्यासाठी तडक येतात. त्यामुळे फक्त महत्वपूर्ण इच्छा करण्यासाठी भक्त हा पाठ करतात असे बोलले जाते.
बजरंगबाण पठणाचे फायदे
बजरंगबाण पठण केल्याने भक्तांमध्ये भीती नाहीशी होते आणि आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक विचारांवर मात करता येते. आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. बजरंग बाण पठण केल्याने भगवान हनुमान आपल्या भक्तांना संकट आणि अडचणीतून बाहेर काढण्यास मदत करतात याचे अनेक भक्तांना अनुभव आहेत. तसेच हा पाठ केल्याने निरोगी आरोग्य आणि ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते.