team jeevandeep 29/04/2025 adhyatma Share
अक्षय तृतीया !
सनातन परंपरेचा मंगल दिन, श्रद्धा आणि शुभतेने भरलेला सोहळा. येत्या बुधवारी (ता.३०) हा पवित्र सण मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. बाजारपेठा साहित्याने सजलेल्या आहेत. मातीची मडकी, पळसाच्या पत्रावळ्या, वाळा, कळस, कच्ची कैरी आणि पूजेचं विविध साहित्य घेण्यासाठी नागरिकांची उत्साही गर्दी पाहायला मिळते आहे.
अक्षय तृतीया म्हणजे शुभ आरंभाचा दिवस. या दिवशी केलेले कोणतेही कार्य "अक्षय" फल देते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच विवाह, गृहप्रवेश, सोने खरेदी यासाठी या दिवशी विशेष महत्त्व असते. भगवान श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. सहस्रनाम वाचन, दानधर्म, आणि पितर पूजनाने घराघरात आध्यात्मिक वातावरण भरून राहाते.
पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नवीन मातीच्या मडक्यांत पाणी भरून त्यात वाळा टाकला जातो. या वाळ्याच्या सुवासिक झुळुकीत कृतज्ञतेची भावना दरवळते. पळसाच्या पत्रावळींवर डाळभात, मुगवडीची भाजी, कुरडया, पापड, भजी, आमरस असा पारंपरिक बेत सजतो. आमरसात चारोळी, खोबरं, गहुला-कचूळा यांचे रसभरित मिश्रण मिसळून गोडसर चव निर्माण केली जाते. कावळ्यांसाठी घरावर नैवेद्य ठेवण्याची सुंदर परंपराही या दिवशी जिवंत ठेवली जाते, जरी आज कावळ्यांची संख्या कमी झाली असली तरी. अक्षय तृतीया हा केवळ सण नाही, तर आपल्या संस्कृतीतील श्रद्धा, कृतज्ञता आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे.
सणाची वैशिष्ट्ये
'अक्षय' म्हणजे न संपणारी, आणि 'तृतीया' म्हणजे अमावस्येनंतरचा तिसरा दिवस. या दिवशी केलेले पुण्य किंवा शुभकार्य अखंडित (सतत वाढणारं) होते, अशी श्रद्धा आहे. नवीन मातीचं मडके आणून त्यात वाळा टाकून पाणी भरले जाते. पळसाच्या पत्रावळीवर पारंपरिक जेवण बनवले जाते आणि पितरांसाठी नैवेद्य दिला जातो.
पितरांचे आशीर्वाद मिळाल्यास घरात सुख-शांती नांदते, अशी श्रद्धा आहे. या दिवसी सोने खरेदी आणि व्यवसायाची सुरुवात केली जाते. नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जाते. काही भागांमध्ये या दिवसानंतर पेरणीसाठी शेतकरी जमिनीत पहिली नांगरटी करतात. निसर्गाशी जोडलेली समृद्धी आणि पावसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. थोडक्यात, अक्षय तृतीया म्हणजे शुभतेचा, परंपरेचा, श्रद्धेचा, आणि कृतज्ञतेचा अमोल संगम आहे.