Visitors: 226981
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

अध्यात्मरंग

  Team jeevandeep       17/05/2025      adhyatma    Share


adhyatm 

समाजजीवनाला कायमच कोणाचा ना कोणाचा आदर्श डोळ्यापुढे लागतो. त्याशिवाय, ते सुस्थानपंथे मार्गक्रमण करत नाही. अध्यात्म ही शक्ती आहे, हे आपण वाचत आलो आहोत. त्या शक्तीचा समाजमनावर असणारा पगडा ठिकठिकाणी दिसतो; त्यामुळे साह्य असो अथवा विरोध असो अध्यात्माचा पगडा समाजावर दिसतोच. अनेकांनी अनेकप्रकारे आणि अनेकदा विरोधी विचारांचा सूर लावला, तरी समाजातले भक्तिपंथी कमी झाले नाहीत. याचे कारण विचार, संवेदना, कल्पना आणि शब्द यांना व्यक्तिविश्वात अनन्य महत्त्व आहे हेच असून याच व्यक्तिविश्वावर अध्यात्माने आपले सुखद रंग पसरविले असल्याने अध्यात्माची ताकद कायम चढती-वाढती राहात आली आहे. माझ्या मनावर ज्या विचारांचे शिंपण होते आणि त्या शिंपणाने जे बीज माझ्या मनात रुजते त्याचा पुढे वृक्ष होतो. मग त्या वृक्षाखाली मला शांत, निवांत वाटत असेल, तर त्यात आश्चर्य नाही. अध्यात्म वृक्षाची वाढ ही अशी झाली आहे; त्यामुळे भिरभिरणारे, भीतीने ग्रस्त असणारे किंवा शांतिशोधक मन अध्यात्मात रमते. नव्या पिढीसमोर अध्यात्माचे हे शास्त्र उलगडयाला हवे. धार्मिक कर्मकांड, त्याचा प्रपोगंडा याशिवाय अध्यात्म वेगळे असते, हे कळणे महत्त्वाचे. उलट न कळणाऱ्या, न समजणाऱ्या गोष्टींवर चर्चा करीत, चर्चेचा चोथा करण्यात सध्याचा काळ आनंद मानतो आणि तो घातक असतो. नीतिवान, चरित्र्यसंपन्न, आदर्श असे जीवन घडविण्यात अध्यात्माचा वाटा मोठा असतो. या शक्तीची किनार जर आयुष्याला लाभली, तर होणारे-दिसणारे बदल हे फारच मोठे असतात.

अर्थानां ईश्वरो यः स्यात्

इंद्रियाणां अनीश्वरः।

इंद्रियाणां अनैश्वर्यात्

ऐश्वर्यात् भ्रश्यते हि सः।।

यामधून दिसणारा अर्थ अध्यात्मशक्तीचा प्रत्यय देतो. धनाढ्य आहे पण चारित्र्यवान नाही. इंद्रियांवर हुकूमत नाही; त्यामुळे धनाढ्यपण फोल ठरते. ज्याच्याकडे धनसंपत्ती आहे त्याला कायमच स्वैराचार आपल्याकडे खेचतो. त्या कुठल्याही मोहाला बळी न पडता, आपले सत्व आणि स्वत्व राखायला हवा. ते तेव्हाच जमते जेव्हा तुमच्या जगण्याची बैठक आध्यात्मिक असेल. समर्थांनी जो मार्ग सांगितला त्यात त्यांनी भौतिक जीवनाला नकार द्यायला सांगितला नाही. उलट ‘संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका’ असाच उपदेश त्यांनी केला. याचा अर्थ आपण आपल्या रोजच्या जगण्याला सत्वयुक्त करू शकलो पाहिजे. ती सत्वाची शक्ती अध्यात्म ज्ञानाशिवाय येऊ शकत नाही. सामर्थ्याला कायमच संवेदनेची जोड असावी लागते. अन्यथा सामर्थ्य हे फक्त शारीरिक पातळीवर उरते. पाहाणे, बोलणे, चालणे, वागणे या सगळया क्रियांमध्ये सामर्थ्य असायला हवे. नुसताच शरीराने धडधाकट असणारा माणूस जिेकण्यास योग्य ठरतो, असे म्हणणे अज्ञानीपणाचे ठरेल. किंबहुना सामर्थ्यशाली मन जेव्हा पुढे येते तेव्हाच प्रश्न सुटतात. अन्यथा प्रश्नांतून उपप्रश्न या पध्दतीने समस्या उग्र रूप धारण करते. प्रत्येकाच्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या सकारात्मक गोष्टी असतात. त्या साकारत्मकतेला जोपर्यंत सुमार्ग दिसत नाही तो पर्यंत ती एकाच ठिकाणी थांबून असते. काही वेळा तर ती सकारात्मकतासुध्दा अन्याय सहन करीत संपते. असे होऊ नये याकरिता अध्यात्म बैठक पक्की असायला हवी. कोणत्याही चळवळीत शारीरिक शक्ती उपयोगाची नसते; त्यामुळे चळवळी उभ्या राहात नाहीत. राहिल्या तरी टिकत नाहीत. दूरगामी आणि चांगल्या दीर्घ परिणामी चळवळींसाठी उपयुक्त असणारे सामर्थ्य अध्यात्मच पुरवू शकते. याची एक ना अनेक उदाहरणे सांगता येतील.

मनोनिग्रह हा स्थिर वृत्तीतून होतो. चंचल वृत्तीने नाही; त्यामुळे सतत भीती, संशय आणि बेभरवशाचे वातावरण अशा व्यक्तींच्या भोवताली नाचते. त्यांना यश दुरापास्त ठरते. ही मानसिक कोलाहलाची अवस्था दूर करणे आणि शांत चित्ताने जीवन व्यतीत करणे सध्याची गरज आहे. त्या शांत जीवनातही कर्तृत्वाला नवे पंख फुटले पाहिजेत. त्यासाठी अध्यात्म अभ्यासायला हवे.

+